विलास रोहीले
कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी दिनकर घोडे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश विटकर, रुद्रायणी ऍग्रो इंडिया चे संस्थापक अध्यक्ष सुहास बळी तसेच कृषी अधिकारी एस. एस. सावंत यांच्या हस्ते दिनकर घोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनकर घोडे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून गुलाब फुलशेती तसेच शिमला मिरची पिकाचे उत्पादन घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी कमी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार उत्पादन साध्य केले आहे.
दिनकर घोडे यांच्या यशस्वी प्रयोगाचा आदर्श घेत कवठे येमाई व शिरूर तालुक्यातील परिसरात आज शंभरहून अधिक पॉलीहाऊस उभारण्यात आले असून, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळताना दिसत आहे.
पॉलीहाऊस शेतीमुळे पाणी व रासायनिक खतांची बचत होते, मजुरी खर्च कमी होतो आणि कमी कष्टात खात्रीशीर नफा मिळतो. अशा पद्धतीने शेती केल्यास शेतकरी कर्जबाजारी न होता कमी जमिनीतूनही अधिक उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती करू शकतो, असे मत दिनकर घोडे यांनी यावेळी व्यक्त केले.