पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण

जिल्हा परिषदेत सलग ५८ वर्षांच्या सत्तेला सुरंग लावण्यांचे स्वप्न भंगले पोपटराव गावडे ठरले ‘किंगमेकर’, ८५ व्या वर्षी बालेकिल्ल्यात फुलवले कमळ

आमचा पक्ष चिन्ह चोरलं पण आमचं कतृत्व कोणी चोरू शकत नाही - पोपटराव गावडे यांचा ईशारा .

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात सलग १९६७ पासून तब्बल ५८ वर्षे प्रतिनिधित्वाचा विक्रम शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नावावर कायम राहिला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारूनही त्यांनी भाजपचे चिन्ह स्वीकारत वरच्या नेत्यांच्या खेळीला कात्रजचा घाट दाखवला आणि वयाच्या ८५ व्या वर्षी बालेकिल्ल्यात कमळ फुलवत आपणच खरे ‘किंगमेकर’ असल्याचे सिद्ध केले.
शिरूर तालुक्यात शरद पवार यांच्या निष्ठावंत फळीत पोपटराव गावडे यांचे नाव आदराने घेतले जाते. १९६२ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पवार साहेबांपूर्वी राजकारणात आले असले तरी त्यानंतर ते कायम त्यांच्या विचारांसोबत ठाम उभे राहिले.
१९६७ मध्ये टाकळी हाजी–शिरूर गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने ते प्रथम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९५ पर्यंत सातत्याने त्यांनी जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केले. पुढे शिरूर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी विधानसभेतही तालुक्याचे नेतृत्व केले.
यानंतर टाकळी हाजी–कवठे येमाई गटातून त्यांच्या चिरंजीव सोनभाऊ गावडे यांनी १५ वर्षे नेतृत्व केले. त्यानंतर सुनिता गावडे यांनी १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य, महिला व बालकल्याण सभापती तसेच शिरूर पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले. दुसऱ्या सुनबाई मनीषा गावडे यांनी शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. म्हणजेच गावडे कुटुंबाचे नेतृत्व सलग ५८ वर्षे जिल्हा परिषदेत टिकून राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही पोपटराव गावडे यांनी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना साथ दिली. पक्षाशी कधीही गद्दारी न करता निष्ठा जपली. पक्षानेच त्यांच्या चिरंजीव राजेंद्र गावडे यांना जिल्हा परिषदेसाठी तयारीला लागा, असा आदेश दिला होता. दोन फेऱ्यांचा प्रचारही पूर्ण झाला होता. मात्र ऐनवेळी तिकीट कापल्याने गावडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उसळली. पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांनाही विश्वासात न घेतल्याची चर्चा रंगली.
“साहेब, आता थांबायचं नाही… लढायचं!” असा नारा देत समर्थक रस्त्यावर उतरले. आयुष्यभर काँग्रेस विचाराशी प्रामाणिक राहिलेल्या पोपटराव गावडे यांना अखेर भाजपची वाट धरावी लागली. सुरुवातीला या भागात कमळाला स्वीकार मिळेल का, अशी शंका होती; मात्र “आमचा पक्ष म्हणजे गावडे साहेब” अशी भूमिका घेत तरुणांसह ज्येष्ठांनीही मोठा प्रतिसाद दिला.
राजेंद्र गावडे यांनी भाजपकडून उमेदवारी स्वीकारताच गावडे समर्थकांनी हा सन्मानाचा लढा बनवला. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत गावडे पॅटर्न अजूनही प्रभावी असल्याचे दाखवून दिले.
वयाच्या ८५ व्या वर्षी “मला पक्षाने धोका दिला, तुमची साथ हवी,” असे थेट मतदारांना आवाहन करत पोपटराव गावडे यांनी बालेकिल्ल्यात कमळ फुलवले आणि शिरूरच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली.
सलग ५८ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळाले असून शिरूर तालुक्याला पुन्हा एकदा संदेश मिळाला आहे —
“टायगर अभी जिंदा है!”

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page